गुरुवार, १ जानेवारी, २०१५

एमएमआरडीएचा ‘नववर्ष धमाका’

सरत्या वर्षात मुंबईकरांना मेट्रो, मोनो, ईस्टर्न फ्री वे आदी प्रकल्पांची भेट देणाऱ्या एमएमआरडीएच्या पेटाऱ्यातून ठाणे, कल्याण, डोंबिवली, नालासोपारा, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या भागांनाही नव्या वर्षाची भेट मिळणार आहे. ही शहरे तसेच त्यांच्या परिसरातील वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी फोडणारे एमएमआरडीएचे तीन महत्त्वाचे प्रकल्प जानेवारी ते एप्रिल २०१५पर्यंत पूर्ण होणार असून फ्लायओव्हर, लिंक रोड, सर्व्हिस रोड, हायवे कनेक्टिव्हीटी आदीच्या माध्यमातून ही शहरे मुंबई-नवी मुंबईशी जलद गतीने जोडली जाणार आहेत.

* कल्याण-खोपोली लिंक रोडः या ७५ कि.मी.च्या लिंक रोडचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सध्या कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, या भागातील लोकांना पुण्याला जाण्यासाठी मागे वळून काटई नाक्यापर्यंत अनेक ठिकाणी टोल भरून यावे लागते. लिंक रोडमुळे हा द्रविडी प्राणायाम टळून थेट खोपोलीपर्यंत जाता येईल. बदलापूर अंबरनाथ पट्ट्यातून मुंबई-नवी मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या लोकांना ट्रेनबरोबरच या रस्त्याचा सुलभ पर्याय उपलब्ध होईल.

* नालासोपारा फ्लायओव्हरः या फ्लायओव्हरमुळे नालासोपारा जंक्शन ते निर्मल गाव जोडणारा रस्ता तयार होत असून, त्यामुळे हायवेवर येण्यासाठी वसई-विरारचा फेरा टळणार आहे. या भागात रेल्वे क्रॉसिंग पूलही होणार आहे.

* भिवंडी फ्लायओव्हरः भिवंडी गावात वंजारपटरी जंक्शन ते शहरापर्यंत उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची गर्दी होते. बाहेरची वाहने आणि शहरातील वाहने यांची कोंडी, होणारे अपघात यावर उतारा म्हणून फ्लायओव्हर बांधला जात असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परिणामी शहराबाहेरून येणारी वाहतूक शहरात न येता फ्लायओव्हरमार्गे मुंबईच्या दिशेने येईल.

* कापूरबावडी फ्लायओव्हरः मुंबईहून ठाणे-घोडबंदर रोडच्या दिशेने व ठाण्याबाहेरून मुंबईच्या दिशेने येताना तीन जंक्शनचे चक्रव्यूह भेदणारा कापूरबावडी फ्लायओव्हर जानेवारी २०१५च्या शेवटच्या आठवड्यात खुला होईल. मुंबई, नाशिक, ठाणे, घोडबंदर असा प्रवास करण्यासाठी सध्या घोडबंदर रोड व मुंबई हा सामाईक रस्ता पार करावा लागतो. हे दिव्य नव्या फ्लायओव्हरमुळे टळेल. परिणामी स्थानिक वाहने व बाहेरून येणारी वाहने यांची सरमिसळ होणार नाही. बाहेरून येणारी अवजड वाहने फ्लायओव्हरवरून परस्पर निघून जातील. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांना दिलासा मिळेल.

* सध्या हाती घेतलेली नवी कामेः कल्याण-डोंबिवलीकरांना रस्तेमार्गे केवळ दहा मिनिटात पोहचवणारा डोंबिवली ते नाशिक भिवंडी बायपास लिंक, खाडी पूल आणि रस्ता (मानकोली मोटागाव लिंक), ठाणे शहरातील एल.बी.एस रोडवरील तीन फ्लायओव्हर, घोडबंदरला सर्व्हिस रोड आदी प्रकल्पांची कामेही वेगाने सुरू आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा